Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आरबीआयने महाराष्ट्रातील 5 सहकारी बँकांवर केली दंडात्मक कारवाई, खातेदारांवर काय परिणाम होणार?

Reserve Bank of India

Image Source : Creative Commons- https://commons.wikimedia.org/wiki/File:Seal_of_the_Reserve_Bank_of_India.png

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील 5 सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. या बँकांना नियमांचे पालन न केल्यामुळे 1 लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे दंड ठोठावण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील 5 मोठ्या सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने या बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच आरबीआयने अभ्युदय सहकारी बँकेवर कारवाई केली होती.

आरबीआयने कोणत्या 5 सहकारी बँकांवर कारवाई केली आहे व याचा खातेदारांवर काय परिणाम होईल? याबाबत जाणून घेऊयात.

कोणत्या बँकांवर केली कारवाई?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यातील 5 सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. यामध्ये इंदापूर अर्बन सहकारी बँक, जनकल्याण सहकारी बँक, पाटण अर्बन सहकारी बँक, पुणे मर्चंट्स सहकारी बँक आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचा समावेश आहे. 

आरबीआयने बँकांवर का केली कारवाई?

आरबीआयने बँकिंग नियामक कायदा 1949 च्या तरतुदीनुसार या सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. आरबीआयने इंदापूर अर्बन सहकारी बँकेला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. डिपॉझिट खाते, मिनिमम बॅलेन्स मेंटेन्स, मालमत्ता वर्गीकरण इत्यादी नियमांचे आरबीआयने जारी केलेल्या निर्देशानुसार पालन न केल्याने कारवाई करण्यात आली.

क्रेडिट सूचनांशी संबंधित नियमांचे पालन न केल्याने मुंबईतील जनकल्याण सहकारी बँकेला 5 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. पाटण अर्बन सहकारी बँकेला 2 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. बँकेने बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 56 सह कलम 26अ चे पालन न केल्याने कारवाई करण्यात आली. बँकेने ठराविक कालावधीमध्ये ठेवीदारांचे शिक्षण व जागरुकता निधीमध्ये रक्कम ट्रान्सफर केली नाही.

आरबीआयने पुणे मर्चंट्स सहकारी बँक आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला प्रत्येकी 1 लाख रुपये दंड ठोठावला आहे. डिपॉझिट खात्यांची पुरेशी माहिती न ठेवल्याबद्दल व निष्क्रिय खात्यांचा वार्षिक आढावा न घेतल्याने कारवाई करण्यात आली.

कारवाईचा खातेदारांवर काय परिणाम होणार?

मध्यवर्ती बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याने या पाचही बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ही कारवाई केवळ दंडात्मक स्वरुपाची आहे. बँकेच्या व्यवहारांवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, या बँकांच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा उद्देश नाही.

तसेच, या कारवाईचा बँकांच्या खातेदारांवर कोणताही परिणाम होणार नाही. बँकेच्या खातेधारक नेहमीप्रमाणेच व्यवहार करू शकतील. थोडक्यात, खातेदारांना पैशांचे व्यवहार करता येणे शक्य आहे. बँकांच्या एटीएममधून देखील पैसे काढता येतील.