Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government Scholarship: विद्यार्थ्यांना फायदेशीर अशा 'या' पाच सरकारी शिष्यवृत्ती योजना

Government Scholarship Scheme

Government Scholarship: भारत सरकारच्या वतीने दरवर्षी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता विविध योजना राबविण्यात येत असते. याअंतर्गत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन आर्थिक साहाय्य केल्या जाते. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या काही शिष्यवृत्तींची माहिती आज आपण येथे जाणून घेणार आहोत.

भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांना शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर त्यांच्या अभ्यासात आर्थिक सहाय्य करण्यासाठी अनेक शिष्यवृत्ती देत असतात. या शिष्यवृत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आज आपण शिक्षण मंत्रालयाच्या अशा 5 महत्त्वाच्या शिष्यवृत्ती बघत आहोत, ज्या शाळा ते महाविद्यालय आणि विद्यापीठापर्यंत तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

केंद्रीय शिष्यवृत्ती योजना (CSSS)

ही शिष्यवृत्ती महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी आहे. असे विद्यार्थी जे 12वी उत्तीर्ण झाले आहेत आणि महाविद्यालयात किंवा विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहेत, अश्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. दरवर्षी शिक्षण मंत्रालय या योजनेअंतर्गत ८२ हजार नवीन शिष्यवृत्ती देते. या अंतर्गत दरवर्षी 10 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान अर्ज मागविण्यात येत असते. यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलद्वारे अर्ज ऑनलाइन करावा लागेल.

कोणाला मिळणार लाभ

  1. बारावीत ८० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी
  2. पूर्णवेळ अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी
  3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसलेले विद्यार्थी

नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थी 8 वी नंतर याचा लाभ घेऊ शकतात. दरवर्षी ही शिष्यवृत्ती देशभरातील एक लाख विद्यार्थ्यांना दिली जाते. प्रति विद्यार्थी 12 हजार रुपये दिल्या जातात. यासाठी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान अर्ज मागविल्या जाते. यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) द्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

कोणाला मिळणार लाभ

  1. यासाठी विद्यार्थ्याला आठवीमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळाले पाहिजेत.
  2. त्यासाठी निवड चाचणीमध्ये त्याची निवड व्हायला हवी.
  3. निवड परीक्षेत बसण्यासाठी विद्यार्थ्याला इयत्ता 7 वी मध्ये किमान 55% गुण असणे अनिवार्य आहे. 
  4. कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 1.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

AICTE प्रगती शिष्यवृत्ती (AICTE प्रगती शिष्यवृत्ती)

ही शिष्यवृत्ती फक्त विद्यार्थिनींसाठी आहे. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. शासनाकडून दरवर्षी अशा 5000 शिष्यवृत्ती दिल्या जातात. या अंतर्गत लाभार्थ्याला वार्षिक 50 हजार रुपये आणि इतर सुविधा मिळतात. त्यासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान अर्ज मागविण्यात येत आहेत. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

कोणाला मिळणार लाभ

  1. अशा विद्यार्थिनी ज्या कोणत्याही तांत्रिक पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमात प्रथम किंवा द्वितीय वर्षात शिकत आहेत. 
  2. ज्यांचा त्या अभ्यासक्रमात प्रवेश 12वी च्या गुणांच्या आधारे लॅटरल एन्ट्रीद्वारे केला जातो. 
  3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.

AICTE सक्षम शिष्यवृत्ती

विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक शिक्षणाला चालना देण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. त्याचा फायदा विशेष दिव्यांग असलेल्या आणि कोणत्याही तांत्रिक पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दिला जातो. याअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला वार्षिक 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती व इतर सुविधा दिल्या जातात. यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान अर्ज मागविण्यात येत आहेत. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

कोणाला मिळणार लाभ

  1. ज्या विद्यार्थ्यांना किमान 40% अपंगत्व आहे.
  2. त्यांनी पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात एआयसीटीई संलग्न संस्थेत लॅटरल एंट्रीद्वारे प्रवेश घेतला आहे.
  3. ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्याहून कमी आहे.

पंतप्रधान संशोधन फेलोशिप (PMRF)

विद्यार्थ्यांमधील संशोधनाच्या प्रवृत्तीला चालना देण्यासाठी ही फेलोशिप दिली जाते. पीएमआरएफ अनुदानासाठी पात्र असलेल्या संस्थेत पीएचडी प्रोग्राममध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो. तथापि, या फेलोशिपच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यार्थ्याकडे इतर पात्रता असणे देखील आवश्यक आहे. या अंतर्गत दरमहा 80 हजार रुपये मानधन दिले जाते.