Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI 2000 Note: 2000 रुपयांची नोट चलनातून बाद होणार; 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून घेण्याचे आवाहन

Rs 2000 note demonetised by RBI

Image Source : www.thehindubusinessline.com

RBI 2000 Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत; ते 30 सप्टेंबरपर्यंत त्या नोटा बदलून घेऊ शकतात किंवा त्याचा व्यवहार करू शकतात.

2000 Note: केंद्र सरकारने 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करून त्याऐवजी 2000 रुपयांची नोट बाजारात आणली होती. 2016 च्या नोटाबंदीमागे सरकारने काळ पैसा रोखण्यासाठी जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करून 2000 रुपयांची नोट आणली होती. ती 2000 रुपयांची नोट आरबीआयने आता मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या नोटा 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत वापरता येणार आहेत. या दरम्यान नागरिक 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकतात.

रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना 2000 रुपयांच्या नोटा नागरिकांना न देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या नोटा जमा करण्याचे आदेश देखील आरबीआयने बँकांना दिले आहेत. देशातील बँकांमध्ये 23 मे पासून या 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्या 30 सप्टेंबरपर्यंत बदलून घेता येणार आहे.

2019 पासून 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद

आरबीआयने 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. 2016-17 मध्ये आरबीआयने 2000 रुपयांच्या 35,429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. त्यानंतरच्या वर्षात 1,115.07 कोटी आणि 2018-19 मध्ये फक्त 466.90 कोटी नोटा छापल्या होत्या.

मोदी सरकारने 2016 मध्ये जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करून त्याऐवजी नवीन 2000 रुपयांच्या नोट आणल्या होत्या. मागे काळा पैसा बाहेर काढण्याचा उद्देश होता. पण 2000 रुपयांची नोट आणूनही बनावट नोटांची संख्या वाढू लागली होती. त्यामुळे आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा हळुहळू बाजारातून कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची आज आरबीआयने अधिकृत घोषणा करत 30 सप्टेंबरपासून ही नोट चलनात असणार नाही.

एकावेळी 10 नोटा बदलता येणार!

आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलून घेण्याची मुदत दिली आहे. या नोटा बदलून घेताना ग्राहकांना एकावेळी फक्त 20 हजारापर्यंतची रक्कम बदलून घेता येणार आहे. 2016 मध्ये सुद्धा आरबीआयने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी वेळ दिली होती. पण त्यावेळी बऱ्याच जणांची अडचण झाली होती. 

2000 रुपयांच्या नोटा छापण्याचा निर्णय चुकीचा होता!

सरकारने आता तरी हे मान्य केले पाहिजे की,  2000 रुपयांच्या नोटा छापण्याचा निर्णय चुकीचा होता. यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांचा चलनावरील विश्वास कमी होण्याची शक्यता आहे. ते पुन्हा घाबरतील, नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत ताटकळत उभे राहतील. नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया सुरळित होण्यासाठी आरबीआयने बँकांना व्यवस्थित सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. तशी व्यवस्था तयार केली पाहिजे. सरकारने जनधन खात्यांचा वापर कदाचित 2000 रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण करण्यासाठी केल्याची शक्यता आहे. यातून मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया देविदास तुळजापूरकर (सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट बँक कर्मचारी फेडरेशन) यांनी ‘महामनी’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.