Organic Farmimg: कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या शोभा गायधने या गेल्या 21 वर्षांपासून शेती करतात. उपराजधानी नागपूर शेजारच्या वर्धा जिल्ह्यातील खैरगाव येथे त्या राहतात. त्यांच्याकडे 15 एकर शेती आहे. त्यापैकी 10 एकर शेती मध्ये त्या निव्वळ सैंद्रिय पध्दतीने हळदीचे उत्पन्न घेतात. मुले हे नोकरीकरीता दुसऱ्या शहरात वास्तव्यास असल्याने शोभा गायधने आणि त्यांचे पती हे दोघेच संपूर्ण शेती सांभाळतात.
Table of contents [Show]
एक एकरला होते भरघोस उत्पन्न
शोभा या 10 एकर शेतीध्ये वायगाव हळदीचे उत्पादन घेतात. या हळदीचे उत्पादन घेतांना त्या गराडी अर्क, महुआ देशी कल्प, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, शेणखत, गांडूळ खत यासारख्या नैसर्गिक खतांचा आणि किटकनाशकांचा वापर करतात. त्यामुळे मिळणारी हळद ही चवदार आणि मानवी आरोग्यास लाभदायक ठरते. हळदीचे उत्पादन घेण्यास लागणारा खर्च वजा करता यामधून शोभा यांना 8 ते 9 लाख रुपयांचा नफा होतो. एक एकर शेतीमध्ये 70 ते 80 क्विंटल (100 किलोचा एक क्विंटल) हळदीचे उत्पन्न मिळते. शोभा या ग्राहकाला हळदीचे महत्व समाजावून सांगत, प्रक्रिया केलेली हळद देखील विक्रीस ठेवतात. सोबतच हळदीचे बेणे, कच्ची हळद, कांडी पावडर विक्रीकरीता उपलब्ध करण्यात आली आहे.
आंतरपिके देतात नफा
शोभा आणि त्यांचे पती मिळून हळद या पिकासोबतच भाजीपालाची देखील लागवड करतात. आंतरपीके म्हणून गहू, तुर, चना, फळे, टोमॅटो, वांगी, लिंबू, शेवगा, भेंडी, गवार, केळी, जांब, आंबा , आदींचे उत्पादन घेतले जाते. यामधून देखील लागत वजा करता वर्षाला लाख ते दोन लाख रुपयांचा नफा होत असल्याची माहिती, शोभा यांनी दिली.
सरकारी योजनांचा लाभ
सतत दोन दशकांपासून नैसर्गिक शेतीची कास धरणाऱ्या शोभा यांनी सरकारी योजनेचा लाभ घेवून 'मागेल त्याला शेततळे' या योजनेअंतर्गत शेतातच 50 मीटरचे शेततळे तयार केले. यामुळे 24 तास पाणी उपलब्ध होत असल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच, महागड्या किटकनाशकांचा आणि खतांचा वापर करीत नसल्याने शोभा यांचा उत्पादन खर्च आपोआप कमी होतो.
कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित
लग्न झाले तेव्हा केवळ 1 वर्ग शिक्षित असलेल्या शोभा यांना मुलांना शिकविता शिकविता अभ्यासात आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी देखील मुलांसह चौथ्या वर्गाची परीक्षा दिली, आणि आपल्या शिक्षणाचा योग्य वापर त्यांनी शेतीमध्ये केला. नऊवारी साडी, डोक्यावर पदर आणि कपाळाला मोठे ठसठशीत कुंकू लावणाऱ्या शोभा यांच्या कडे बघून त्यांच्या यशाची कल्पणा करताच येत नाही. मात्र त्यांची मेहनत, निसर्गाबाबतची आत्मियता आणि शेतीबाबत असेललं ज्ञान बघून त्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार मिळाला आहे.
रासायनिक खते, फवारणी, कीटकनाशके यांचा विपरित परिणाम शेती बरोबरच मनुष्याच्या आरोग्यावर आणि जीवनावर देखील होतो. त्यामुळे भविष्यातील पिढी सशक्त घडवायची असेल, तर नैसर्गिक आणि सेंद्रिय पध्दतीने शेती करण्याकडे वळा, असा मोलाचा सल्ला शोभा गायधने यांनी दिला.