Bank Account Fraud : मुंबईत मागच्या तीन दिवसांत एका बनावट sms च्या आधारे 40 च्या वर लोकांना फसवण्यात आलंय. मुंबई पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आणि फसवले गेलेल्यांमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीचाही समावेश आहे.
आपल्या वॉट्स अॅपवर एक मेसेज नियमितपणे येतो. तुमचं बँक अकाऊंटचं kyc करणं बाकी आहे आणि पॅन कार्ड अपडेट व्हायचं आहे. अनेकदा आपलं ज्या बँकेत खातं आहे, तिथूनच हा मेसेज येतो. आणि असा मेसेज अनेकदा बरोबरची निघतो.
पण, मुंबईनगरीत अशा मेसेजमुळे किमान 40 जणांची फसगत झाली आहे. या सगळ्या घटना अलीकडच्या म्हणजे 2 ते 5 मार्चच्या आहेत. एसएमएस वरून नवीन वेबसाईटवर गेलेल्या लोकांच्या बँक अकाऊंटची माहिती सायबर चोरांना मिळाली. आणि त्यांनी लोकांच्या खात्यातले लाखो रुपये काढून घेतले आहेत.
Source : www.quora.com
बेमालूनपणे फसवल्या गेलेल्या लोकांमध्ये श्वेता मेनन या अभिनेत्रीचाही समावेश आहे. तिने आपल्याबरोबर झालेल्या फसवणुकीबद्दल बोलताना म्हटलंय की, ‘पैशाविषयीचं एक कटू सत्य मला पैसे गमावल्यावर कळलं. एका मेसेजवर आलेल्या लिंकवर क्लिक करून मी एका वेबपेजवर गेले. तिथे माझा पॅन नंबर, दोन ओटीपी, बँक खातं क्रमांक, ऑनलाईन आयडी असं सगळं भरलं. हा फॉर्म भरल्यावर काही तासात माझ्या दोन खात्यात मिळून 58 हजारांच्या वर रक्कम चोरांनी काढून घेतली. मी खार पोलीस ठाण्यात चौकशी केली तेव्हा कळलं माझ्या सारखीच फसवणूक आणखी 50 जणांची झाली होती.’
कशी झाली सायबर चोरी?
मागच्या आठवड्यात अनेकांच्या फोनवर मेसेज यायला सुरुवात झाली. त्याचा मजकूर असा होता,
‘Dear Customer, you Bank ACCOUNT Has Been Blocked Today Please Update Your PAN CARD, https://rb.gy/x5tvws/’
या लिंकवर क्लिक केल्यावर नवीन बनावट वेबसाईट उघडत होती. आणि या वेबसाईटवर एक फॉर्म भरायला सांगितला जात होता. या फॉर्ममध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर, बँक खातं क्रमांक, ऑनलाईन व्यवहारांसाठी लागणारा ID क्रमांक अशी सगळी माहिती विचारली जात होती. शिवाय दोन वेळा तुमच्या नोंदणी केलेल्या नंबरवर ओटीपीही येत होता.
ओटीपी दिल्यानंतर अगदी काही मिनिटांत त्या लोकांच्या खात्यावरून बरीच रक्कम काढून घेण्यात आली. मुंबई उपनगरातल्या पोलीस स्थानकांमध्ये वारंवार अशा तक्रारी येऊ लागल्यावर सायबर क्राईम विभागाने ही सगळी प्रकरणं एकत्र केली. तर मागच्या तीन दिवसांत अशी 47 प्रकरणं निघाली. आणि प्रकरणं अजून बाहेर येतच आहेत.
सायबर गुन्हे विभागाने घेतली दखल
प्रकरणांची संख्या वाढत गेल्यावर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलचे उपायुक्त बलराम राजपूत यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. यात आताच्या सायबर घोटाळ्याची माहिती देण्याबरोबरच आपल्याबरोबर असं घडू नये यासाठी घ्यायची काळजीही लिहिलेली आहे.
बलराम राजपूत यांनी अलीकडेच एक ट्विट करून ऑनलाईन सायबर घोटाळ्यांची माहिती दिली आहे.
More than 16 Lakh cybercrime incidents reported in India since 2020
याशिवाय पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात लोकांनी अशा ईमेलना बळी पडू नये यासाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत,
तुमची खाजगी आर्थिक माहिती अनोळखी लोक, वेबसाईटना देऊ नका
KYC साठी बँक शाखेला भेट द्या. किंवा बँकेच्या अधिकृत साईटवर जा
मोबाईल फोनसाठी पासवर्ड ठेवा
चुकून वेबसाईट उघडलीच तर तिचा url नीट तपासा. वरच्या प्रकरणामध्ये url योग्य नाही हे स्पष्ट दिसतंय.
तुमचं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेला ताबडतोब झालेल्या फसवणुकीविषयी कळवा
नुकत्या झालेल्या प्रकरणात ठाण्याच्या एका व्यक्तीचे पैसे मुंबई सायबर सेलने परत मिळवून दिले. त्याबद्दल त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.
@MumbaiPolice काल माझ्या बँक खात्यातून रु.38000 ची ऑनलाईन फसवणूक झाली होती. NMJ पो. ठाणे येथे तक्रार करण्यासाठी आलो असता सायबर सेल चे PSI SAYYAD, HC AMOL PATIL यांनी मला तात्काळ मदत करून 24 तासाच्या आत माझे सर्व पैसे मला परत मिळवून दिले. त्याबद्दल खूप आभारी आहे. धन्यवाद
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फसवणुकीची शंका जरी आली तरी तुम्ही सायबर सेलची मदत घेऊ शकता. पोलीसही आधी तेच करण्याचा सल्ला तुम्हाला देतात. तुम्ही जवळच्या पोलीस स्थानकांत तक्रार केलीत तरी पोलीस गुन्ह्याचं स्वरुप बघून तुमचं प्रकरणं सायबर सेलकडे वर्ग करू शकतात.
पण, त्या व्यतिरिक्त तुम्ही फोनवरून किंवा वेबसाईटवर जाऊनही सायबर सेलकडे तक्रार करू शकता.
वेबसाईटवर गेल्यावर ‘file a complaint’ क्लिक करायचं
आणि तुमची तक्रार अगदी सविस्तर लिहायची
तुमचा मोबाईल क्रमांक, ईमेल, पत्ता द्यावा लागतो
तुमच्या शहरात सायबर सेलचं कार्यालय नसेल तर नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा
महत्त्वाचं म्हणजे तक्रार केल्यानंतर तुमच्याकडे सगळे कागदोपत्री पुरावे गोळा करून ठेवा. पोलीस चौकशीत आणि पुढे केस उभी राहिल्यावर त्यांची कधीही गरज पडू शकते. तुम्हाला आलेला ईमेल किंवा sms ही जपून ठेवा.
SEBI Registration : कॅपव्हीजन कंपनीने आपल्या ग्राहकांना सिक्युरिटी मार्केटमधून खात्रीशीर परतावा देण्याचा दावा केला होता. अशा प्रकारे ही कंपनी आपल्या ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल करून बाजारात पैसे गुंतवण्याचा सल्ला देत होती. SEBI च्या हे लक्षात आले असता त्यांनी या कंपनीची नोंदणी रद्द केली आहे
Insurance Company Deceives Farmers : अवकाळी पावसासोबतच शेतकऱ्यांना अजून एक शॉक. विमा कंपनीकडून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 3 कोटी 95 लाख 9 हजार 177 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
आधार कार्ड प्रणालीमध्ये कोट्यवधी भारतीयांची वैयक्तिक माहिती साठवलेली आहे. अत्यंत संवेदनशील असलेल्या या माहितीवर आर्थिक गुन्हेगारांचा डोळा आहे. दिल्लीमध्ये आधार कार्ड माहिती प्रणालीमध्ये घुसखोरी झाल्याचे समोर आले आहे. तसेच ऑनलाइन प्रणालीतील त्रुटींचा फायदा घेतल्याचे समोर आले आहे. एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक आधार कार्ड असल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.