Agricultural Subsidies: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ व्हावी व राज्यातील शेतकरी हे आधुनिक शेतीकडे वळावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असते. शेतकऱ्यांना प्रगतीशील शेती करताना आर्थिक मदत व्हावी, यासाठी शासन राज्यात विविध योजना राबवितात. या कोणत्या योजना आहेत, हे आपण सविस्तरपणे जाणून घेवुयात.
पोक्रा योजना (Pokra Scheme)
पोक्रा योजनेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना असेदेखील म्हटले जाते. या योजनेअंतर्गत 15 जिल्हे व 5142 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून विहिर योजना, तुषार सिंचन, ठिंबक सिंचना, मोटार पंप संच, नवीन विहिर व जुनी विहिर बांधकाम, शेततळे, कुक्कुट पालन, मधुमक्षिका पालन, फळ लागवड योजना अशा विविध योजनांचा लाभ घेता येतो. जर तुमच्या गावाचा समावेश या योजनेअंतर्गत येत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. यामध्ये काही योजनेसाठी 40 टक्के तर काही योजनेसाठी 100 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोक्रा योजनेच्या आफीशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.
महाडीबीटी शेतकरी योजना (Mahadbt Farmer Scheme)
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा यासाठी महाडीबीटी योजनेसंबंधित सर्व माहिती या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर आहे. या पोर्टलवर शेतीसंबंधित सर्व प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. मात्र या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांना महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही आनलाइन आहे. अर्जाची स्वीकार झाल्यास या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होते.
नावीन्यपूर्ण योजना महाराष्ट्र (Navinya Purna Yojana)
नावीन्यपूर्ण योजना ही पशुपालकांसाठी फायदेशीर आहे. या योजनेअंतर्गत गाय व म्हशीचे गट वाटप करणे, शेळी व मेंढीचे गट वाटप करणे आणि कुक्कुट पालन अनुदान सारख्या योजना राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर आॅनलाइन अर्ज करावे लागते. हा अर्ज शेतकरी घरबसल्या मोबाईलवरूनदेखील भरू शकतात. नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती व अनुसुचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 टक्के तर ओपन प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान प्राप्त होते. या योजना राज्यात पशु संवर्धन विभागाच्याव्दारे सुरू करण्यात आल्या आहेत.
पीएम कुसुम योजना (PM Kusum Yojana)
राज्यातील सर्वात महत्वाची योजना म्हणजे पीएम कुसुम योजना. ही महत्वपूर्ण योजना केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. या प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीमध्ये सौर कृषी पंप बसविण्यासाठी अनुदान देण्यात येते. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेसाठी साधारण 90 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आॅनलाइन पध्दतीने अर्ज करावा लागतो. या योजनेचा लाभ तेच शेतकरी घेऊ शकतात, ज्यांनी अटल सौर कृषी पंप योजना व मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ घेतला नाही. राज्यात या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजना (Krishi Yantrikaran Yojana)
महाराष्ट्र राज्य कृषी योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकण योजना राबविण्यात येते. या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्यांनी आधुनिकतेकडे वळणे हा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणारी महत्वपूर्ण यंत्रे, शेती सामग्री, उपकरणे, औषध फवारणी पंप, डस्टर, सिंचन पंप अशा अनेक कारणांसाठी अनुदान दिले जाते. या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर आॅनलाइन अर्ज भरावा लागेल. या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड ही लाॅटरी पध्दतीने करण्यात येते. या योजनेसाठी शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने सुमारे 80 टक्केपर्यंत अनुदान दिले जाते.
पीएम किसान योजना (PM Kisan Yojana)
केंद्र शासनाच्यावतीने देशातील सर्व राज्यात पीएम किसान योजना ही राबवली जाते. ही देशातील सर्वात महत्वपूर्ण योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रूपये देण्यात येते. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होते. 2 हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. तसेच या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच सदस्याला घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम किसान योजना पोर्टलला भेट द्या व आॅनलाइन पध्दतीने अर्ज भरावा. या योजनेचा लाभ देशातील प्रत्येक शेतकरी घेऊ शकतो.